२०२० साठीचा चमेली देवी जैन उत्कृष्ट महिला माध्यमकर्मी पुरस्कार “गाव कनेक्शन’ या ग्रामीण भारताचे वार्तांकन करणाऱ्या माध्यमसंस्थेच्या नीतू सिंग यांना प्रदान करण्यात आला.
या पुरस्कारासाठी समांतर माध्यमात काम करणाऱ्या नीतू सिंग यांची निवड अनेक पातळ्यांवर महत्वाची आहे.
द मीडिया फाउंडेशन कडून देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या चमेली देवी जैन उत्कृष्ट महिला माध्यमकर्मी पुरस्काराचे वितरण नुकतेच झाले. २०२० साठीचा चमेली देवी जैन उत्कृष्ट महिला माध्यमकर्मी पुरस्कार “गाव कनेक्शन’ या ग्रामीण भारताचे वार्तांकन करणाऱ्या माध्यमसंस्थेच्या नीतू सिंग यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्कारासाठी समांतर माध्यमात काम करणाऱ्या नीतू सिंग यांची निवड अनेक पातळ्यांवर महत्वाची आहे.
गाव कनेक्शन ही ग्रामीण भारताचे सखोल आणि प्रयोगशील वार्तांकन करणारी माध्यम संस्था आहे. तसंच यातील बातम्या आणि वार्तांकन हे ग्रामीण वाचक आणि प्रेक्षकांना केंद्रस्थानी ठेऊन करण्यात येतं. सर्वसाधारणपणे मुख्य प्रवाहातील बातम्या ह्या शहरी वाचक आणि प्रेक्षकांना केंद्रस्थानी ठेऊन करण्यात येतात. त्यातले एक महत्वाच कारण म्हणजे बातम्यांसोबत येणाऱ्या जाहिरातींचा ग्राहक हा बहुतांश शहरी असतो. अशा शहरकेंद्री माध्यम अवकाशामध्ये गाव कनेक्शन सारखे प्रयोग ग्रामीण भारताचे शक्य होईल तेवढे प्रतिनिधित्व करण्याचा प्रयत्न करत आहेत. शक्य तेवढ्या रिसोर्सेसमध्ये ही माध्यमसंस्था दर्जेदार ग्राउंड रिपोर्टिंग करत आहे. तसेच ग्रामीण भारतातील प्रश्नांना वाचा फोडणारा दबावगट म्हणूनही गाव कनेक्शनकडं पाहिलं जातं. सध्या तरी गाव कनेक्शनने उत्तर भारतातील अनेक राज्यांमधील ग्रामीण भागांमध्ये आपला प्रभाव सिद्ध केला आहे. ग्रामीण भारताचे ग्राउंड रिपोर्टिंग हे गाव कनेक्शनचे बलस्थान आहे. गाव कनेक्शन फक्त ग्रामीण भारताचं वार्तांकन करत नाही तर ग्रामीण भारतातील नागरिकांचा माध्यमातील सहभाग वाढविण्याचा प्रयत्नही करत आहे. तसचं त्यांच्यापर्यंत बातम्या पोहचाविण्यासाठीची नवीन प्रयोगशीलताही आत्मसाथ करून ग्रामीण वार्तांकनाची नवीन शैली माध्यमात रुजविण्याच्या दृष्टीने गाव कनेक्शनचे महत्व आहे.
नीतू सिंग यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे गाव कनेक्शन सारख्या समांतर माध्यमांचे महत्व अधोरेखित झाले आहे. तसाच ग्राउंड रिपोर्टिंगची जी पोकळी माध्यमात निर्माण झाली आहे, ती भरून काढण्याचे काम गाव कनेक्शन सारख्या संस्था करत आहेत. ज्या वाचक, प्रेक्षकांना माध्यमातील सध्याच्या परीस्थितीमध्ये काय पहायचं आणि वाचायचं हा प्रश्न पडला असेल त्यांच्यासाठी गाव कनेक्शनसारखे प्रयोग पर्याय असू शकतात.
(लेखक प्रा. अभिषेक भोसले, पुण्यातील विश्वकर्मा विद्यापीठाच्या पत्रकारिता आणि जन संज्ञापन विभागात व्याख्याते आहेत)


